तुम्ही ‘जाने तू या जाने ना’ हा हिंदी चित्रपट पाहिला असेल, तर त्यातील एक गंमत नक्की आठवत असेल. चित्रपटाच्या नायकाला सांगितलं जातं की राठोड कुळाचं नाव टिकवायचं असेल, तर तीन अटी पूर्ण कराव्या लागतील — “वो घोड़े पर सवार होगा”, “किसी की पसली एक करेगा”, आणि “वो एक बार जेल जाएगा”. चित्रपटाच्या अखेरीपर्यंत तो त्या तिन्ही अटी पूर्ण करतो.

हे पाहताना मी मजेने विचार केला — कोंडेकर कुळाचं नाव राखायचं असेल, तर अटी काय असतील? आणि मग माझ्याच डोक्यातून तीन अटी ठरल्या —

  1. शिक्षकी पेशा स्वीकारेल
  2. घर भाड्याने देईल
  3. एका संस्थेचा कोषाध्यक्ष बनेल

२००९ साली, मुंबईत स्थलांतर करताना मी हैदराबादमधील घर भाड्याने दिलं आणि स्वतःशीच ठरवलं — “कोंडेकर कुळाचं नाव राखलंय मी!” काही वर्षं मी अभियांत्रिकी महाविद्यालयात प्राध्यापक होतो आणि आमच्या अपार्टमेंट असोसिएशनचा कोषाध्यक्षसुद्धा. प्रथमदर्शनी वाटेल की या अटी मुद्दाम स्वतःच्या सोयीने ठरवल्या, पण माझ्या आई-वडिलांची जीवनशैली आणि त्यांनी आम्हाला घडवलेली पद्धत बघितली, तर याचा अर्थ पटल्याशिवाय राहत नाही.

माझे आई-वडील दोघंही पेशाने शिक्षक. आता ते निवृत्त झाले आहेत. आम्ही घरातच त्यांच्याकडून विषय शिकायचो, पण त्याहीपेक्षा त्यांची शिकवण्याची कला आमच्यात झिरपत गेली. आईसोबत अभ्यास करताना तो अभ्यास वाटायचाच नाही. ती घरकाम करत असे आणि आम्ही तिच्या भोवती पुस्तकं घेऊन फिरत असू. ती एका हाताने स्वयंपाक करत आणि दुसऱ्या हाताने आम्हाला समजावत. भाषेच्या धड्यातली नाटकं आम्ही सजीव करून अनुभवत असू. आम्ही भाऊ एकमेकांसाठी प्रश्नपत्रिका तयार करत सराव करायचो. सुटीच्या दिवशीही शाळेचं टाइमटेबल पाळायचं आमचं वेड होतं.

परीक्षा संपल्यावर जेव्हा उत्तरपत्रिका घरी पडताळणीस यायच्या, तेव्हा त्यातली काही मजेशीर उत्तरं वाचताना आमची करमणूक व्हायची. एकंदरीत घरात एक शैक्षणिक वतावरण होतं. वाचनालयातून मासिकं, पुस्तकं यायचीच. आईवडील आम्हाला वक्तृत्व, वादविवाद, लेखन यासाठी सातत्याने प्रोत्साहित करायचे. कदाचित याचं फळ म्हणजे भाषण किंवा लिखाण मला कधीच भीतीदायक वाटलं नाही. आई म्हणायची — भाषण मजेदार असावं. आम्ही त्यावरून गमतीने म्हणायचो — “सीधी सी बात ना मिर्ची मसाला, कैसे सुनेगा सुनने वाला?”

घर भाड्याने देण्यामागचं मूल्य — मेहनतीने कमावणं, आणि भविष्यासाठी तयारी करत राहणं — हे मला आई-वडिलांकडूनच मिळालं. त्यांचं बालपण खडतर, लग्नानंतर कोणताही आधार नव्हता. स्वतःच्या कष्टावर त्यांनी सगळं उभं केलं. त्यांच्या पहिल्या घरातली एक खोली भाड्याने दिली होती. आज त्यांच्या घरात १२ खोल्या आहेत, त्यातल्या आठ खोल्या भाड्याने आहेत. उत्पन्न तर आहेच, पण घरात सतत माणसं असल्यामुळे घरही “जिवंत” राहतं. त्यांची मुले दूरवर असली, तरी त्या उण्यापुऱ्या क्षणांमध्येही घरात माणूसपणाचं अस्तित्व जाणवतं.

“हात फिरे, तिथे लक्ष्मी फिरे” हे वडिलांचं ब्रीदवाक्य. म्हणून आम्हाला घरच्या कोणत्याही कामाची लाज वाटत नाही.

मात्र त्यांच्या आयुष्यातली खरी शिकवण म्हणजे प्रामाणिकपणा. आणि याची खरी कसोटी येते, ती पैशाच्या व्यवहारात. वडिलांची पहिली नोकरी — तालुक्याच्या गावाहून संपूर्ण स्टाफचा पगार घेऊन येण्याची जबाबदारी. त्यानंतर संपूर्ण कारकिर्दीत सर्वांनी त्यांच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवला. आज ८० व्या वर्षी सुद्धा ते दोन मंदिरांच्या ट्रस्टचे कोषाध्यक्ष आहेत.

आईवडीलांचं जीवन हेच आमचं व्यक्तिमत्त्व घडवतं. माझ्या शिक्षकी कारकीर्दीत मी विद्यार्थ्यांचा लाडका राहिलो, कारण मला वाटायचं — विषय विद्यार्थ्यांना आवडायला हवा. आजही कोणतेही शारीरिक काम मी मनापासून करतो, त्यामुळे शरीर चपळ राहतं आणि मन नम्र. हैदराबादला असोसिएशनचा कोषाध्यक्ष झाल्यानंतर मी जमाखर्च पारदर्शक केला. ज्यांच्यावर आधी शंका घेतली जायची, तीच माणसं प्रामाणिक वाटू लागली. जरी दोन रुपयांचा हिशोब चुकला, तरी तो नीट लागेपर्यंत मी वेळ द्यायला तयार असायचो.

आज बरंच काही बदललं आहे, पण आई-वडिलांची मूल्यं अजून माझ्यात आहेत आणि कायम राहतील.

आज त्यांच्या लग्नाचा ५५वा वाढदिवस आहे आणि त्या निमित्ताने हा लेख लिहितोय.

आई-दादा, तुमच्या लग्नाच्या वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

(२८ फेब्रुवारी २०२१)